पंकजा मुंडे यांच्याकडून उध्दव ठाकरे यांचे कौतुक

बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केले आहे. मी त्यांचे अभिनंदन करते त्यांना शुभेच्छा देते. परंतु हे पॅकेज पुरेसे नाही. आपण आणखी उदारता दाखवा आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा. ते शेतकऱ्यांना दिलासा देतील असा विश्वास पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसऱ्या मेळाव्यात व्यक्त केला.

ऑनलाईन मेळावा घेण्याचे ठरल्यानंतर ही या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरवर्षी प्रमाणे या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऊस तोडणी कामगार प्रश्न पक्षांत राच्या चर्चा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेकी दुर्दशा अशा मुद्द्यांवर आज मुंडे यांनी भाष्य केले.
मी घर बदलणार नाही असं म्हणत मुंडे यांनी पक्षांतरांच्या चर्चांना आज पूर्णविराम दिला. पक्षाच काम देशाच्या पातळीवर करणार असल्याचं त्यांनी या मेळाव्यात स्पष्ट केले. आज माझ्याकडे कोणतंही पद नाही मी ग्रामपंचायत सदस्या ही नाही, पण ज्यावेळेस मी आज भगवान गडाकडे येत होते त्यावेळी गावोगावी माझे लोकांनी स्वागत केले, मला आशीर्वाद दिले. त्यावेळी का लोक माझ्यावर प्रेम करतात का माझा एवढा आदर करतात ह्याचा विचार करत असताना मला भगवान बाबांची मूर्ती आणि मुंडे साहेबांची कीर्ती दिसली.
मला तुझी काळजी वाटते असे रस्त्यात भेटलेल्या आयाबाया म्हणत होत्या. त्यांना माझी काळजी वाटणं आणि मला त्यांची काळजी वाटणं हीच आमची मोठी शक्ती आहे. ही मला मिळालेली जनसंपत्ती कमी होऊ नये हेच माझं भगवान बाबांकडे मागणं असतं. ज्या व्यक्तीविषयी प्रेमाने अपेक्षा मरून गेलेले असतात. तो राजकारणात कितीही मोठा झाला तरी लोकांना त्याचं सोयरसुतक नसतं. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. पंकजाताई गेल्या, त्या आता घरी बसल्या असा अपप्रचार झाला. अरे मी राजकारण कसं सोडेल अस म्हणून त्यांनी अपप्रचार करणाऱ्यांचा समाचार घेतला. ज्यांना मी संपले असं वाटत होतं त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
कोरोना संकट काळात ऊस तोडणी कामगारांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठी मी प्रयत्न केले. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुंडे यांनी सांगितले. या सरकारचं चांगल्या कामांचं कौतुक करण्याचं धारिष्ट्य गोपीनाथ मुंडेंच्या कन्येत आहे. त्याचप्रमाणे या सरकारला जाब विचारण्याचं धारिष्ट्यदेखील आहे. हे धारिष्ट्य तुम्हा सगळ्यांच्या बळावर आहे. माझं जीवनच तुम्हाला अर्पण आहे’, असं ही त्या म्हणाल्या.
भाजपचं सरकार येईल, असं कधी वाटत नसताना मुंडे साहेबांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. शिवाजी पार्क भरुन मी सभा घेणार असे ते मित्रांना म्हणायचे, मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेचा समारोप शिवतीर्थावर झाला. त्यामुळे शिवतीर्थावर एक दिवस मी सभा घेतल्याशिवाय राहणार नाही’, असा निश्चय पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यात केला.



