वेळ आली तर शरद पवार सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करतील. अजिदादांना नाही.- चंद्रकांत पाटील

सांगली: भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करायची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांपेक्षा सुप्रिया सुळे यांना प्राधान्य देतील, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
सध्या अजित पवार त्यांचे काका शरद पवार यांच्याबद्दल गोडवे गात आहेत. मात्र, गेल्यावर्षी तीन दिवसांसाठी का होईना, त्यांनी काकांना सोडले होते, हा इतिहास विसरुन कसा चालेल, असा बोचरा सवाल चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेस ही दरबारी लोकांची पार्टी आहे. भाजप हा सामान्य माणसाचा पक्ष आहे. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी मी कोथरूडला अडकलो होतो. त्यामुळे इस्लामपुरात पुरेसे लक्ष देता आले नाही. आमच्यात मतभेद नसते तर इस्लामपूरात जयंत पाटील यांची सुट्टी केली असती. मग ते राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते राहिले असते. आता आगामी निवडणुकीत पाहूच, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला

राज्यात गेल्यावर्षी अजित पवार यांना हाताशी धरून भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकासघाडीतील नेत्यांनी या आठवणींना उजाळा देत एकप्रकारे भाजप नेत्यांच्या जखमेवर मीठ चोळले.



या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले. आता कितीही गोडवे गायले तरी गेल्यावर्षी तीन दिवसांसाठी अजितदादांनी काकांना सोडले होते, हा इतिहास आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करायची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांपेक्षा सुप्रिया सुळे यांना प्राधान्य देतील, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.






