कादंबरी असते समाजाचा विस्तृत जीवनपट : साहित्यिक वि.दा. पिंगळे

साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून वारजेतील साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण केल्याचा आनंद : बाबा धुमाळ
वारजे साहित्यिक कट्ट्यावर अंतहीन आकाश कादंबरीचे प्रकाशन..
वारजे : कादंबरी हा समाजाचा एक विस्तृत व विशाल असा जीवनपट असतो. कविता व कथेपेक्षा लेखकाला समाजाचे विविध प्रश्न मुक्तपणाने मांडता येतात . अंतहीन आकाश या कादंबरीमध्ये देखील मध्यमवर्गीय समाजाची होणारी ससेहोलपट, त्यांचा विविध प्रश्नांसाठीचा संघर्ष अतिशय मार्मिकपणे व स्पष्टपणे डॉ. रमेश जलतारे यांनी मांडलेला आहे असे मत साहित्यिक व वक्ते वि.दा. पिंगळे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कट्टा वारजे व ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान वारजे पुणे आयोजित प्राचार्य डॉ. रमेश जलतारे लिखित अंतहीन आकाश या कादंबरीचे प्रकाशन साहित्यिक वि.दा. पिंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष वि.ग. सातपुते, उपाध्यक्ष डॉ.महेंद्र ठाकूरदास, वारजे साहित्य कट्ट्याचे अध्यक्ष ,माजी नगरसेवक मा .बाबा उर्फ प्रदीप धुमाळ, पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सौ. दिपालीताई धुमाळ, वारजे साहित्य कट्ट्याचे सचिव मा.डी. के. जोशी, स्वयंप्रकाशनाचे प्रकाशक मा.शुभानंन चिंचकर ,प्राचार्य नंदकिशोर बोदाई ,एकता मासिकेच्या संपादक रूपालीताई भुसारी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
पिंगळे म्हणाले, रमेश जलतारे हे कवी , लेखक आणि समाजचिंतक आहेत .समाजाचे समकालीन मूल्य पकडून त्यावर प्रखळपणे ते भाष्य करतात. या कादंबरीमध्ये देखील त्यांनी व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारलेले आहेत . रघुनाथराव हे या कादंबरीतले मुख्य पात्र आहेत .मुंबईत एका चाळीत राहणारे ते आपला संसार कसा ओढतात, काय काय संघर्ष त्यांना करावा लागतो आणि शेवटी हाती काय लागते याचे उत्तम चित्रण या कादंबरीमध्ये आहे. वाचकांना निश्चित ही कादंबरी खेळवून ठेवते हे या कादंबरीचे मोठे यश आहे. खूप दिवसांनी एक चांगली कादंबरी वाचायला मिळाली याचे समाधान देखील वि.दा. पिंगळे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेला तरी अजूनही सामान्य माणसांचे प्रश्न का सुटत नाहीत ? हा डोळ्यात अंजन घालणारा प्रश्न त्यांनी या कादंबरीतून पुढे आणलेला आहे असे पिंगळे म्हणाले.



आठ वर्षांपूर्वी वारजे भागातील साहित्यिक व कलावंतांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून वारजे साहित्य कट्ट्याची उभारणी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून केली. आज पर्यंत असंख्य कार्यक्रम या व्यासपीठावर संपन्न झाले. पुणे महानगरपालिकेतील हा सर्वात आदर्श साहित्यिक कट्टा आहे, याचे विशेष समाधान देखील वाटते असे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
डि.के. जोशी यांनी प्रास्ताविक व्यक्त केले . अतुल घटवाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश जलतारे यांनी कादंबरी लेखनामागची भूमिका विशद केली. गंगुबाई धुमाळ उद्यान सभागृह वारजे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.



