अटलजींनी जगाला भारताची नवी ओळख करून दिली.- देवेंद्र फडणवीस

गौरव ‘अटल’, ‘भारतरत्न’ कर्मयोगीचा !
पुणे : देशाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे अटलजी. कवीमनाचे, साहित्यिक, संवेदनशील मनाचे असे विरोधीपक्षांचेही लाडके अटलजी होते. अटलजींनी दबाव झुगारून अणुचाचणी केली आणि जगाला सांगितले भारत कोणाच्या दबावापुढे झुकणार नाही. अशी जगासमोर भारताची नवी ओळख करून दिली. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा या वर्षीचा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून मानपत्र, पुणेरी पगडी आणि एक लाख रुपये गौरवनिधी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी डॉ. माशेलकर यांच्या पत्नी वैशाली यांना ही सन्मानीत केले.
याप्रसंगी कोथरूड मतदार संघाचे आमदार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, संयोजक आणि महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे, दत्ता खाडे, संवादचे सुनील महाजन उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला महापौर मोहोळ यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करुन पुरस्काराची पार्श्वभूमी सांगत प्रास्ताविक केले.

‘देशाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे अटलजी. कवीमनाचे, साहित्यिक, संवेदनशील मनाचे असे विरोधीपक्षांचेही लाडके अटलजी होते. अटलजींनी दबाव झुगारून अणुचाचणी केली आणि जगाला सांगितले भारत कोणाच्या दबावापुढे झुकणार नाही. अशी जगासमोर भारताची नवी ओळख करून दिली. अटलजींना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल, तर ते डॉ. माशेलकर सरांना विचारायचे. डॉ. माशेलकर सर हे ‘रसायनच’ वेगळे आहे. माशेलकर यांनी भारताची शक्ती ओळखून आपल्या बुद्धीचा उपयोग सामान्यांसाठी केला. ‘हल्दी घाट’ची लढाई जशी इतिहासात प्रसिद्ध आहे, तशीच डॉ. माशेलकर यांनी हळदी आणि बासमती पेटंटसाठी दिलेला लढा बुद्धिवंताना त्यांचा सन्मान देण्यासाठी उपयोगी पडतो आहे, असे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
तर पुरस्काराला उत्तर देताना डॉ. माशेलकर म्हणाले, ‘आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, पण कर्मयोगी अटलजींच्या नावाने दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार मी विनम्रपणे स्विकारुन संस्कृती प्रतिष्ठानचे आभार मानतो.
‘अटलजी आणि माशेलकर सर यांनी कर्तृत्वाचे उत्तुंग शिखर गाठले. पण त्यांच्यातील नम्रता कमी झाली नाही. महापौर मोहोळ यांची कोरोना काळातील केलेल्या कामाचे कौतुक असून सर्व कुटुंबासह कोरोनाबाधित होऊन ही शहराकडे दुर्लक्ष होवू दिले नाही आणि सर्व विषयाला उत्तम न्याय महापौर पुण्यनगरीला मिळाले आहेत, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपली भावना व्यक्त केली.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम पार पडला. संवाद पुणेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर अटलजींच्या रचना सादर केल्या, तर अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी यावर नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे संयोजन सुनील महाजन यांनी केले. तर नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे.



