क्या हुआ तेरा वादा… चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन देऊन एका वर्षांनंतर हि रस्ता झालाच नाही.म्हातोबानगरमधील रस्त्यासाठी रहिवाशांचा रास्ता रोको

कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वचन पाळले नसल्याचा रहिवाशांचा आरोप
पुणे : एक वर्षांपूर्वी कोथरूडचे आमदार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी पाटील यांनी दोन महिन्यात रस्त्याचं काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या म्हातोबा नगर येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने संतप्त झालेल्या म्हातोबानगर येथील रहिवाशांनी एकत्र येत शनिवारी सकाळी रस्तारोको आंदोलन केले.
आमदार येतात आश्वासन देतात पण प्रश्न सुटतच नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून कोथरूड मधील पौड रस्ता परिसरातील म्हातोबानगर येथील रहिवाशी रस्त्यासाठी संघर्ष करीत आहेत. या प्रश्नासाठी कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मेधा कुलकर्णी यांनी या भागात भेट देऊन रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते.आणि आत्ताचे पालकमंत्री व स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी या परिसराला भेट देत चर्चा सत्र आयोजित करीत रस्ता करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते पूर्णच झाले नाही. पाटील यांनी आता तरी दिलेले वचन पूर्ण करावे आणि रस्त्याचे काम मार्गी लावावे.या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आहेत अडचणी
हा रस्ता करण्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. संरक्षण मंत्रालयाची परवानगी या रस्त्यासाठी आवश्यक आहे. तसेच भूसंपादन करणे आवश्यक आहे.यामुळे रस्ता करण्यास अडचण येत आहे. मात्र केवळ मतांच्या राजकारणासाठी राजकीय व्यक्ती आश्वासन देतात का ? आश्वासन देऊन नागरिकांना का खेळवून ठेवले जात आहे ? खरच हा प्रश्न सोडविण्याची राजकीय लोकांना इच्छा आहे का ? असे प्रश्न नागरीक उपस्थित करत आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी म्हातोबानगर रस्त्याचे काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.त्यावेळी दोन महिन्यात रस्त्याचं काम पुर्ण करण्यात येईल. असे आश्वासन पाटील यांनी दिले होते. मात्र कामाला सुरुवातच झाली नाही.
अनेक वर्षापासून या भागाला रस्ता नाही. सध्या उपलब्ध असलेला कच्चा मातीचा रस्ता बांधकाम व्यावसायिकांच्या डंपर मुळे आणखीनच खराब होत आहे. त्यात या डंपर मुळे अपघाताची शक्यता आहे. त्यातच आता पावसास सुरुवात होणार आहे. त्यामुळे चिखलातून आणि खड्ड्यातून नागरीकांना प्रवास करावा लागणार आहे.
त्यामूळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने रस्त्याचे काम पुर्ण करावे अशी मागणी रहिवाशी करीत आहेत.







