चांदणी चौकाचे नवीन नाव अजितदादा, चंद्रकांत दादा या दोघांनी ठरवावं ; मी मान्यता देईल : गडकरी

चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन संपन्न
पुणे : पुणे शहरातील मेट्रोला अभ्यासू लोकांमुळेच उशीर झाला, परंतु आता इतर प्रकल्पांना लवकर मंजुरी द्या असे सांगताना पुणे शहर आता आहे तेवढेच राहू द्या ते वाढू देऊ नका असं आवाहनही केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई बेंगलोर महामार्गावरील कोथरूड मधील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या बहुमजली उड्डाण पुलाचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उपसभापती नीलम गोऱ्हे , रुपाली चाकणकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ,उपस्थित होते.

आताचे पुणे आणि पूर्वीचे पुणे यातील फरक सांगताना गडकरी यांनी आपल्या लहानपणीची आठवण सांगितली. लहान असताना मी माझ्या बहिणीकडे स्वारगेटला महर्षीनगर येथे येत असत. त्यावेळी तेथून पर्वती दिसत. मला आठवते पर्वतीवरून गारा हवा येत असे परंतु आता ही हवा हरवली आहे. शहर प्रदूषित झाले आहे. आता पुणे शहराला हवा,पाणी, आवाज अशा प्रदूषणापासून मुक्त करावे लागणार आहे. शहर डिझेल पेट्रोल पासून मुक्त झाले तर मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी करण्यास मदत मिळणार आहे.
पुढे ते म्हणाले पुणे शहरात कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याची योजना आहे. परंतु वीज निर्मिती प्रकल्प करण्या ऐवजी ग्रीन हायड्रोजन तयार करा आणि तेच उद्याचे भविष्य आहे,असा सल्ला गडकरींनी दिला. पुण्यातील कचऱ्याचा रिंग रोड तयार करण्यासाठी वापर केला तर शहरात कचरा उरणार नाही.
चांदणी चौक नाव कसे पडले हे अजित पवार यांनी सांगितले आता चांदणी चौकाचे नाव दोन्ही दादांनी म्हणजे अजित दादा व चंद्रकांत दादा यांनी मिळून ठरवावे, त्याला मान्यता दिली जाईल असे गडकरी म्हणाले.



यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की चांदणी चौकाने कोणाला सोडले नाही. मुख्यमंत्र्यांना देखील याचा अनुभव आला आहे. सगळ्यांचा वेळ वाया घालवण्याचे काम येथील वाहतूक कोंडीने केले आहे. परंतु आता यातून दिलासा मिळणार आहे.
अजित पवार यांनी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याला जाहीर सभेत थेट प्रतिउत्तर देत त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. पवार म्हणाले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे. अजित पवार यांनी परस्पर बैठका घेतल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. पण हा दावा तथ्यहीन आहे, असं पवार म्हणाले.
मागील दोन दिवसाच्या बातम्या बघितल्या तर अजित पवारांनी बैठक घेतली. अरे तुझ्या का पोटात दुखतय? बैठक घेतली तर काय? सह्याद्री अतिथीगृह येथे मी रिसोर्सेस वाढवण्यासाठी मीटिंग घेतली होती. फडणवीस देखील होते. मुख्यमंत्री हे पद वेगळं आहे आम्ही दोघांनी बैठका घेतल्या तरी अंतिम निर्णय त्यांचाच असणार आहे. तरीदेखील कॉल्ड वर चाललय अस म्हणतात. आता कुठे विरोधी पक्ष नेते झाले आणि त्यांना कुठे कोल्ड दिसलं हे कोणाला माहिती,. असे पवार म्हणाले.






