मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले वाच्यता नको; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

अहमदनगर : मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलताय. काल एक जण काहीतरी बडबला की, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा.17 नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत त्यांनाच आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं.









