शरद पवार सगळ्यांना पुरून उरतील : जयंत पाटील

मुंबई : भाजपच्या सत्ताकाळात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पेट्रोल 120 रुपयांवर गेले आहे. श्रीलंकेच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा प्रवास सुरू झाला आहे. त्यावर कोणी बोलायला तयार नाही. इथे काय तर ईडी, धाडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या मुद्द्यांवर डिबेट घडवले जात आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. कितीही चिखलफेक करा, आरोप करा, टीका करा, शरद पवार सगळ्यांना पुरून उरतील, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सर्वात जास्त टीका केली. राष्ट्रवादी हा सर्वांसाठी काम करणारा पक्ष आहे, अठरापगड जातींना सोबत घेऊन विकास करणारा पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादीवर हल्ला केला जात आहे. पण मला त्यांना सांगायचंय, कितीही टीका करा, आरोप करा, पवारसाहेब सर्वांना पुरून उरतील. बेरोजगारीचे काय? महागाईचे काय? महिलांवरील अत्याचाराचे काय? या मूळ प्रश्नांना सोयीस्कर बगल दिली जात आहे. आपल्याला या विरोधात आवाज उठवण्यासाठी एक कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण करायची आहे, असे जयंत पाटील म्हणाले. इथली व्यवस्था जीर्ण आणि कमकुवत झाली आहे. तिला चांगली आणि बळकट करण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उचलायला हवा.







