सध्याच्या भाजपमध्ये सुसंस्कृतपणाचा अभाव- किशोरी पेडणेकर

92 दंगलीत आणि कोविडच्या संकटात शिवसेनाच महाराष्ट्रातील लोकांसाठी उपयोगी पडली – किशोरी पेडणेकर
पुणे : सुसंस्कृत नेतृत्व असलेल्या भाजपशी आमचे मैत्रीचे नाते होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत काम करण्याचा चांगला अनुभव आला. मात्र आता भाजपमध्ये बाहेरील लोकांची संख्या वाढल्याने सुसंस्कृपणाचा अभाव पाहायला मिळत आहे. असा टोला मारत शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेतृत्वावर टीका केली.
महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना आणि शिवसाई संस्थेच्या वतीने कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या लावणी महोत्सवाचे उद्घाटन पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना उपनेते शशिकांत सुतार, माजी पोलीस उपायुक्त भानुप्रताप बर्गे, गणेश दुबे, आयोजक जयदीप पडवळ उपस्थित होते.
पेडणेकर म्हणाल्या, कोविड च्या संकटांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मोठे काम केले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने कोविड काळात केलेल्या कामाचे जगभरातून कौतुक झाले आहे.
शिवसेनेचे महाराष्ट्रातील जनतेशी कौटुंबिक नाते आहे. 1992 च्या दंगलीत आणि कोविडच्या संकटात शिवसेनाच लोकांच्या मदतीला धावली. यापुढेही कायम लोकांच्या साठी शिवसेना काम करीत राहील.




