महाराष्ट्र

महाविकास आघाडीला १० मार्चनंतर सत्ता सोडण्याची वेळ येईल : चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असा विश्वास भाकीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांना अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती असे सांगितले तर देशमुख म्हणतात की, त्यांना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते.

दुसरीकडे आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांनी सांगितले की, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव आणला होता. या गंभीर आरोपांनंतर आघाडीच्या नेत्यांनी काहीही संवेदनशीलता दाखवली नसली तर ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

त्यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड व एकूण संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे तो आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांचा सत्कार करून काल पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार असा आपला सवाल आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. पोलिसांनी निःपक्षपातीपणे चौकशी केली नाही तर आपण न्यायालयात जाऊ.

पुण्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने गोमुत्र आणि गुलाबजल टाकून त्या पायऱ्या स्वच्छ केल्या. त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता पाटील म्हणाले की, काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरील विश्वास वाढलेला पाहून आपल्याला खूप आनंद झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये