कोरोना काळात निधन पावलेल्या रिक्षाचालकांच्या पत्नींना तातडीने परवाने मिळावेत आमदार सिध्दार्थ शिरोळे यांची मागणी

मुंबई :कोरोना काळात निधन पावलेल्या रिक्षाचालकांच्या पत्नींच्या नावे परवाने तातडीने द्यावेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत प्रादेशिक परिवहन (आरटीओ ) विभागाशी संबंधित समस्यांबाबत आमदार शिरोळे यांनी प्रश्न मांडले.कोरोनाकाळात बऱ्याच रिक्षाचालकांचे निधन झाले. अशा चालकांच्या विधवा पत्नीच्या नावाने परमिट करताना विलंब होत आहे. त्यामुळे बऱ्याच रिक्षा धूळ खात पडलेल्या आहेत. हे परवाने लवकरात लवकर मंजूर करण्याकरिता सरकारने काय उपाययोजना केली ? अशी विचारणा आमदार शिरोळे यांनी केली.

महाराष्ट्रातील सर्व आरटीओ ऑफीसमध्ये चुकीची नोंद झाल्यास, उदाहरणार्थ पेट्रोल ऐवजी डिझेल अशा दुरुस्त्या पूर्वी आरटीओ ऑफीसमध्ये सीनीअर क्लार्ककडून दुरुस्त करून घेता येत होत्या. आता दुरुस्ती टीसी ऑफिसला ईमेल करून पाठविली जाते. यात दोन तीन महिन्यांचा विलंब लागतो. या प्रक्रियेत सरकारकडे कोणत्या उपाययोजना आहेत ? असाही प्रश्न आमदार शिरोळे यांनी सभागृहात उपस्थित केला.
तसेच, वाहन हस्तांतर अथवा कर्ज उतरविताना आरसी स्मार्ट कार्ड आणि इतर एनओसी मिळविण्यात विलंब होतो याचीही दखल सरकारने घ्यावी, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.






