गुरुवारी पाणी गेले पण रविवार आला तरी पाणी आलेच नाही ; वारजेतील नागरिकांमध्ये संताप

पाणीपुरवठा अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये संताप
पुणे : गुरुवार दिनांक १ डिसेंबर रोजी शहरातील इतर भागासह वारजे परिसरातील पाणी पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेकडून बंद ठेवण्यात आला होता, पण त्यानंतर आज रविवार तीन दिवस झाले तरी वारजे हायवे परिसरातील काही भागात पाणी आलेच नाही तर काही भागात कमी दाबाने थोडावेळ पाणी आले. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड पाणी समस्येला तोंड द्यावे लागत असून पालिक प्रशासनाविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
तीन तीन दिवस नागरिकांना पाणी येत नसेल तर यातून महापालिकेच्या नियोजनाचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. मागील महिन्यात गुरुवारी 10 नोव्हेंबरला पाणी पुरवठा दुरुस्तीसाठी बंद होता त्यावेळीही पुढील दोन तीन दिवस नागरिकांना पाणी नव्हते. महापालिकेचा टॅक्स भरून दर पंधरा दिवसाला नागरिकांना अशा पद्धतीने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असेल तर नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल हे नक्की आहे. आणि दर पंधरा दिवसाला कसली दुरुस्ती केली जात आहे याचा तपशील जनतेला कळू द्या असे आवाहन धुमाळ यांनी प्रशासनाला केले आहे.
गुरूवारी पाणी गेल्यानंतर आज रविवारी उजाडला तरी पाणी आले नसल्याने नागरिकांची मोठी पंचायत झाली. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांना कॉल केल्यानंतर ते मोबाईल रिसिव्ह करत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. पार पाडता येत नसेल तर जबाबदारी घेतात कशाला असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले असून अशीच परिस्थिती राहिली तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसत आहे.




