प्रधानमंत्री आवास योजनेची मुदत 31 मार्चला संपणार : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री आवाज योजना (शहरी) मार्च 2022 मध्ये (PMAY End 31 March 2022) संपेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी लोकसभेत दिली आहे. प्रधानमंत्री आवाज योजनेच्या (PMAY) माध्यमातून स्वस्त दरात घरं उपलब्ध करून दिले जात होते. आतापर्यंत राज्यांनी केलेल्या मागणीच्या आधारे या योजनेअंतर्गत 1.15 कोटी घरांना मंजुरी दिली गेली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) ची संकल्पना जून 2015 मध्ये अंमलात आणली. आतापर्यंत घरांच्या मागणीने एक कोटीचा प्रारंभिक अंदाज ओलांडला आहे. सध्या घरांची संख्या 1.15 कोटी आहे आणि चालू आर्थिक वर्षांच्या तीन दिवसांत ही संख्या आणखी वाढेल. मार्च 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयांकडे पक्के घर आणि शौचालय असावे. तसेच या घरावर महिलेचे नाव असावे, असं पंतप्रधान मोदींचं स्वप्न होतं असं हरदीप पुरी म्हणाले. तसेच क्रेडिट-लिंक्ड सबसिडी योजना 31 मार्च 2022 नंतर सुरू ठेवण्याचा विचार नाही, असंही त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत सर्व राज्यांना जून 2015 पर्यंत केंद्राकडे मागणीचे मूल्यांकन देण्यास सांगितले होते. त्याआधारे एक कोटी घरे बांधली जाणार होती. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना-शहरीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. आता खासगी क्षेत्रात परवडणारी घरे बांधली जात आहेत. काही राज्ये आम्हाला आणखी मागण्या पाठवत आहेत. यामुळे पंतप्रधानांचे PMAY-U शी संबंधित स्वप्न पूर्ण होणार आहे, असं पुरी म्हणाले आहेत.




