अजित पवारांकडून राज्यपालांची थेट मोदींकडे तक्रार

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार यांनी सणसणीत टोला लगावला आहे. महत्वाच्या पदांवर असणारे व्यक्ती अनावश्यक वक्तव्य करत आहेत. यामुळे अनावश्यक गोष्टी घडत आहेत. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला हे पटणारे नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे कधीही महाराष्ट्राला हे सहन होणार नाही. मी हे कोणताही संकूचित विचार न ठेवता बोलत आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य स्थापन केलं आणि महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. या महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचं आहे,’ असंही अजित पवार म्हणाले.
पुण्यात मेट्रो सुरू होण्यास 12 वर्षे लागली. पुणेकरांना मागच्या काही वर्षात मेट्रो तयार होण्यास त्रास झाला. पुणे ते पिंपरी चिचवड लवकरात लवकर मेट्रो व्हावी अशी माझी विनंती आहे. तसेच पुण्यातील मुख्य नद्या असणाऱ्या मुळा आणि मुठा नद्या सुशोभिकरण होणे गरजेचे आहे. नदी पात्रातील पाण्याचे स्त्रोत आणि पर्यावरणाला कोणताही धोका न होता याचे काम करावे लागेल. पुण्यातील नद्यांच्या पूर नियंत्रण रेषेचा विचार करून नद्यांचे सुशोभिकरण व्हावे असे अजित पवार म्हणाले.



पुणे मेट्रोप्रमाणेच पुण्यातील इतर प्रकल्पांसाठी देखील मदत करण्याची विनंती यावेळी अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली. “पंतप्रधानांना मला विनंती करायची आहे, की अजूनही पिंपरी चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज आणि पुण्यातल्या वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेट या जोडमार्गांचा अहवाल तयार करायचं काम सुरू आहे. जसं आत्ताच्या मेट्रोमध्ये 50 टक्के केंद्र सरकार, 50 टक्के राज्य सरकारचा निधी आहे, त्याचप्रकारे या बाकीच्या मार्गांसाठी देखील केंद्राची मदत झाली, तर पुणेकरांसाठी मोठं काम होईल”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.



