वारकरी दिंडयांना उतरण्यासाठी पुणे मनपाच्या शाळा मोफत उपलब्ध करून द्या : पृथ्वीराज सुतार

पुणे : १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी आहे. दरवर्षीप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान आळंदी येथून व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान देहू वरून साधारण पंधरा वीस दिवस आधी होते. दोन्ही पालखी पुणे मुक्कामी असताना हजारो वारकरी दिंड्या पालख्यांबरोबर येत असतात. या दिंड्यांची पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये मोफत राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.
या संदर्भात सुतार यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. पुणे शहरामध्ये ३० जून व १ जुलै रोजी पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना राहण्यासाठी संपूर्ण शहरातील विविध भागातील मनपाच्या शाळा मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात, ही “शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत, असे सुतार यांनी निवेदनात म्हंटले आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपुरकडे निघाल्यानंतर वारीतील वारकऱ्यांची योग्य व्यवस्था होणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने पालख्या पुणे मुक्कामी असताना पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये वारीतील दिंड्यांची मोफत राहण्याची सोय करून योग्य त्या सुविधा पुरवल्या जाव्यात अशी मागणी सुतार यांनी केली आहे.









