मशाल चिन्हावर विजयी झालेले ‘हे’ होते शिवसेनेचे पहिले आमदार

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (दि. १०) उद्धव ठाकरे गटाचे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (Shivsena Uddhav Balasaheb Thackray) असे पक्षाचे नाव मान्य करत ‘मशाल’ हे (Flambeau Symbol) निवडणूक चिन्ह त्यांच्या पक्षाला दिले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मशाल चिन्हावर विजयी झालेल्या पहिल्या उमेदवाराची माहिती तुम्हाला देणार आहोत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena suprimo Balasaheb Thackray) यांच्या शिवसेनेच्या तत्कालीन ‘मशाल’ चिन्हाशी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या आठवणी संलग्न आहेत. २ मार्च १९८५ ला शिवसेनेचे उमेदवार आणि तेही ‘मशाल’ चिन्हावर माझगाव विधानसभा (Mazgaon Constituency) मतदारसंघातून विजयी झाले होते. (Flambeau symbol have a many memories of party workers in history)






भुजबळ त्या वेळी शिवसेनेचे एकमेव आणि पहिले आमदार ठरले आहेत. त्यानंतर एप्रिल १९८५ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्या वेळी शिवसेनेचे ७४ नगरसेवक निवडून आले होते आणि शिवसेनेने भुजबळ यांना महापौर म्हणून संधी दिली. १९८१ मध्ये भुजबळ दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर झाले होते.



भुजबळ १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले होते आणि १९७३ ते १९७४ या काळात ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. श्री. भुजबळ यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली असून, १९९१ मध्ये त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री, तर गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्री होते. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते झाले.



काँग्रेसच्या विभाजनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सहभागी झाले. १८ ऑक्टोबर १९९९ ला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेत पोचले. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री होते. ८ डिसेंबर २००८ ला महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. येवला मतदारसंघातून ते आता विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. राज्यातील सत्तांतरापूर्वी त्यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये अन्न व नागरीपुरवठा मंत्रिपद होते.



