स्वतःला हिंदुस्थानी म्हणवणारे पाकिस्तानी प्रसिद्ध लेखक तारिक फतेह यांचं निधन..

नवी दिल्ली :पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध लेखक तारिक फतेह यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीला त्यांची मुलगी नताशाने दुजोरा दिला आहे. दरम्यान फतेह हे नेहमीच पाकिस्तान सरकार आणि लष्कराचे विरोधक राहिले. ते स्वतःला हिंदुस्थानी म्हणवत असे. तारिक हे भारताबद्दलच्या उदारमतवादी वृत्तीमुळे खूप लोकप्रिय होते.
त्यांची मुलगी नताशाने ट्विट केले की, ‘पंजाबचा सिंह, भारताचा मुलगा, कॅनडाचा प्रेमी, सत्य सांगणारा, न्यायासाठी लढणारा, दलितांचा आवाज आणि अत्याचारित तारिक फतेह आता आमच्यात नाहीत. त्याचे कार्य आणि त्याची क्रांती त्याला ओळखणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्वांसोबत राहतील.
तारिक फतेहचे कुटुंब मुंबईचे रहिवासी होते. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंब पाकिस्तानातील कराची येथे स्थायिक झाले. तारिक फतेह यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1949 रोजी कराचीमध्ये झाला होता. प्रसिद्ध लेखक तारिक फतेह यांनी कराची विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीचे शिक्षण घेतले, पण नंतर त्यांनी पत्रकारितेला प्राधान्य देत या क्षेत्रात प्रवेश केला.
एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी 1970 मध्ये कराची सन या वृत्तपत्रासाठी वार्तांकन केले आहे. शोध पत्रकारितेमुळे ते अनेकदा तुरुंगातही गेले. मात्र, तारिक नंतर पाकिस्तान सोडून सौदी अरेबियात गेले. तेथून ते 1987 मध्ये कॅनडामध्ये स्थायिक झाले.
तारिक फतेह हे पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन लेखक, प्रसारक आणि धर्मनिरपेक्ष उदारमतवादी कार्यकर्ते म्हणून ओळखले गेले. इस्लामी अतिरेकाविरुद्ध ते सतत बोलत राहिले आणि लिहीत राहिले. ते समलैंगिक व्यक्तींच्या समान हक्क आणि हितसंबंधांच्या बाजूनेही होते. यासोबतच त्यांनी बलुचिस्तानमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनावरही बरेच लिखाण केले आणि बोलले. आझाद बलुचिस्तानचे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख होती.




