गाजावाजा करुन सुरू केलेल्या या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’कडे प्रवाशांची पाठ

पुणे/मुंबई : मोठा गाजावाजा करुन सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसकडं प्रवाशांनी अवघ्या दोन महिन्यातच पाठ फिरवली असल्याचे समोर आले आहे. या गाडीमुळे रेल्वेला 56.3 टक्केच कमाई झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
11 फेब्रुवारी 2023 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीमधील 64 फेऱ्यांची आकडेवारी जाहीर झाली आहे. या काळात चेअर कार आणि एक्सिक्युटिव्ह कार यांच्यात अनुक्रमे 65536 आणि 6656 असे 72192 प्रवाशांनी बुकिंग केले. सोलापूरनंतर वंदे भारत एक्स्प्रेसला कुर्डुवाडीमध्ये स्टॉप आहे. इथून एका फेरीसाठी पुणे आणि मुंबईला फक्त 10 ते 20 पॅसेंजरच प्रवास करत आहेत.
या फेऱ्यांच्या कालावधीमध्ये वंदेभारतला 8,99,09,760 इतकं उत्पन्न मिळणं अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात 5,06, 20,254 इतकंच प्रत्यक्ष उत्पादन मिळाले आहे. या कालावधीमधील आकडेवारीनुसार चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार मार्फत अनुक्रमे 87.09 आणि 76.6 टक्के बुकिंग झाली आहे. या संपूर्ण आकडेवारीनुसार सोलापूर – मुंबई दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस मार्फत रेल्वे विभागाला 56.03 टक्के उत्पन्न मिळाले आहे.
सोलापूरहून पुण्यासाठी ‘हुतात्मा एक्स्प्रेस’ला पसंती
वंदे भारत एक्स्प्रेसनंतर अर्ध्या तासांच्या फरकानंच हुतात्मा एक्स्प्रेस ही सोलापूरहून पुण्यासाठी सुटते. या गाडीनं आम्ही तासाभराच्या फरकानं पुण्याला पोहचतो. त्याचबरोबर याचे तिकीटही वंदे भारतपेक्षा बरंच कमी आहे, त्यामुळे आम्ही नेहमीच्या हुतात्मा एक्स्प्रेसला पसंती देतो, अशी प्रतिक्रिया या मार्गावरील नियमित प्रवाशांनी दिली आहे.




