दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. परिस्थिती लक्षात घेता सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलिस दल) 15 तुकड्या दिल्ली आणि सीमावर्ती भागात तैनात केल्या जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी दिल्लीतील परिस्थितीसंदर्भात सुरू असलेली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.( Big decision of Union Home Ministry against the backdrop of violence in Delhi )

ही बैठक सुमारे दोन तास चालली. या बैठकीत आयबी संचालक आणि गृहसचिवांसह सर्व उच्च अधिकारी उपस्थित होते. बैठकीतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अनेक संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यास सांगण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांनी अजूनही हिंसाचाराची शक्यता वर्तवली आहे.



हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्रालयाकडून दिल्लीतील सिंघू, टिकरी, गाजीपूर बॉर्डर, मुकरबा चौक आणि नांगलोआ परिसरातील इंटरनेट सेवा रात्री 12 पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लाल किल्ल्या जवळची परिस्थिती अजूनही पूर्णपणे निवळलेले नसल्याने मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश (एन्ट्री) आणि बाहेर येण्याचे दरवाजे बंद केले आहे. दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, ITO मेट्रो स्टेशन, ग्रे लाइन येथील सगळे मेट्रो स्टेशन, जामा मस्जिद मेट्रो, दिलशाद गार्डन, झिलमिल और मानसरोवर पार्क मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहे. काही आंदोलक आपापल्या सीमांवर परतत आहेत. पण लाल किल्ल्यावर आंदोलकांचा जमाव अजूनही कायम आहे.












