भोंग्यावरून देशातील वातावरण तापविण्याचा भाजप समर्थित 33 शाखांचा प्रयत्न : दिलीप वळसे पाटील

नागपूर : केंद्र सरकार आणि भाजपने महागाई, बेरोजगारी, सीमासुरक्षा यावर चर्चा केली पाहिजे. मात्र, या समस्यांवरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. राज ठाकरेंच्या समर्थनार्थ भोंग्यावरून वातावरण तापविण्याचा भाजप समर्थित 33 शाखांचा प्रयत्न आहे, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भोंगा प्रकरणाकडे लक्ष न देता सरकारचे काम लोकांपर्यंत घेऊन जावे. राज ठाकरे यांच्या भूमिकेला बजरंग दल आणि इतर संघटनांचा पाठिंबा आहे, असे वळसे पाटील म्हणाले. त्यावर एका कार्यकर्त्याने त्यांच्यामागे भाजपच्या ३३ शाखा आहेत, असे सांगितले. हाच धागा पकडून वळसे पाटील यांनी देशातील वातावरण बिघडवण्यासाठी भाजप समर्थित ३३ शाखा काम करीत असल्याचे सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न कोण करीत आहे, याबाबत गृहमंत्री पाटील यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. मात्र, अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये झालेल्या हिंसक घटनेमागे कोण आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
राज्यातील दोषींना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवणे ही गमतीदार बाब आहे. राज्यात अलीकडे सरकारचे अधिकार बाजूला सारून काही दोषींना, काही व्यक्तींना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे. हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. राज्य सरकार नागरिकांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. केंद्र सरकार सुरक्षा देऊ शकते, पण सुरक्षेचा वापर कशासाठी करायचा हे त्यांनीच ठरवावे, असेही गृहमंत्री म्हणाले.










