आधी भाजपशासित राज्यातील ‘भोंगे’ उतरवा : प्रवीण तोगडिया

नागपूर : भाजपने आधी मध्यप्रदेश, गुजरात आणि जिथे भाजपचे सरकार आहे तिथे ‘भोंगे’ हटवण्याचे आदेश द्यावे आणि महाराष्ट्रात आंदोलन सुरू ठेवावे. पण सत्ता असलेल्या ठिकाणी भोंगे हटवायचे नाही आणि महाराष्ट्रात आंदोलन करायचे, हे चुकीचे आहे, अशी टीका आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली.
नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली. भागवत म्हणतात 15 वर्षात अखंड भारत निर्माण करायचा आहे. सध्या त्यांचीच सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवावे. यासाठी त्यांनी काश्मीर खोऱ्यात हिंदूंचे पुनर्वसन करावे आणि एक रात्र तिथे काढावी, आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये संघाची शाखा सुरू करावी, मी सरसंघचालकांसोबत शाखेत असेल, असेही ते म्हणाले. प्रवीण तोगडीया यांनी मोहन भागवत यांनी स्वत: रणगाड्यावर बसून पाकिस्तानवर हल्ला करावा असा खोचक सल्ला दिलाय. अखंड भारताचं हेडगेवार यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. भाजपच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या केंद्र सरकारला आदेश द्या. मी आठवण करुन देऊ इच्छितो की सत्तेत नसतो तेव्हा वचन द्यायचं असतं सत्तेत असतो तेव्हा करुन दाखवायचं असतं. त्यामुळे वचन देण्याचं तुमचं काम पूर्ण झालंय,” असं तोगडीया म्हणाले.
पुढे बोलताना तोगडीया यांनी, “आता तुमच्या स्वयंसेवकांचं सरकार आहे. त्यांच्याकडे १५ लाखांचं सैन्य आहे तर आता करुन दाखवण्याची वेळ आलीय. त्यामुळे आपलं स्वागत समर्थन करताना सात वर्षांपासून काश्मिरी हिंदूना पुन्हा त्यांच्या मूळ घरी विस्थापित करण्यात आलेलं नाहीय याची आठवण करुन देत पुढील एका महिन्यात या हिंदूंचं त्यांच्या मूळ जागी विस्थापन करावं. त्यानंतर स्वत: त्यांनी काश्मिरी हिंदूंसोबत काश्मीरमधील गावात रहावं
हा अखंड भारताचा पहिला टप्पा असेल,” असं म्हटलं.
“पाक व्याप्त काश्मीरवर ताबा मिळवावा. तिथं मोहन भागवत यांनी संघाची शाखा सुरु करावी. स्वयंसेवक म्हणून तिथं प्रवीण तोगडीया नमस्ते सदा वस्तले म्हणायला येईल. रशिया युक्रेनमध्ये घुसू शकतो तर पाक व्याप्त काश्मीर तर आपल्या बापाचा आहे. तिसऱ्या टप्प्यात पाकिस्तानवर हल्ला करा. यावेळी मोहन भागवत यांनी स्वत: टँकमध्ये बसून जावं. भागवत यांचा टँक जिथून जाईल त्या जागेची सफाई करण्याचं काम प्रवीण तोगडीया करेल,” असंही तोगडीया म्हणाले.







