नवाब मलिकांच्या सत्तेतील सहभागावरून देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांना पत्र

मुंबई : आज जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाले. ते कोणत्या गटाकडे जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.पण मलिक सत्तेत असलेल्या अजित पवार गटाच्या बाजूला जावून बसल्याने ते कोणत्या बाजूला आहेत हे स्पष्ट झाले आहे. मात्र यावरून विरोधकांनी रान उठवलं असून देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत नवाब मलिक यांच्याबाबत आपली असणारी भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस यांनी पत्रात म्हंटले आहे की, माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.

सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचेजरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.
आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.









