मला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडली? चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं अजित पवारांचा टोला

कराड : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदावरुन टोचल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फटकेबाजी केली आहे. “चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडली? आम्ही स्वप्नं पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत.” असा टोला अजित पवारांनी लगावला.
“सरकार पडणार आहे हे विरोधी पक्षांना सतत म्हणावंच लागतं. 1995 ते 99 च्या काळात आम्ही 80 जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी आणि आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं” असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कराडमध्ये प्रीतीसंगमावर गेले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

“आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही हे मी स्पष्टपणे सांगू शकतो” असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं.
ते 105 असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे. त्यामुळेच सारखं काही ना काही काड्या पेटवायचं काम त्यांचं सुरू आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.



चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
“जयंत पाटील, अजित पवार, हसन मुश्रीफ माझ्यावर टीका करताना शरद पवारांच्या प्लसमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना सल्ला दिला की, उद्या मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आलीच, तर ते सुप्रिया सुळेंना संधी देतील. आता उपमुख्यमंत्री करायची वेळ आली, तेव्हा शरद पवार यांनी अजित पवारांना केलं… की जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांना केलं? अजित पवारांनी तर बंडखोरी केली होती, घर सोडलं, पक्ष सोडला होता. पण उपमुख्यमंत्री करायची वेळ आली, तेव्हा पवारांनी कोणाची निवड केली? कारण ही शरद पवारांची पार्टी आहे, त्यांना हवं त्याला ते मुख्यमंत्री करणार” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.






