उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू

लखनौ:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा आज पार पडणार आहे. राज्याच्या पश्चिम भागाच्या ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघात मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या ५८ मतदारसंघातील प्रचार बुधवारी थंडावला.
मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली असून करोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वे राबवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारमधील श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंह, कपिलदेव अगरवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नारायण हे मंत्री पहिल्या टप्प्यात प्रमुख उमेदवार आहेत.
या ५८ मतदारसंघात एकूण ६२३ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून दोन कोटी २७ लाख मतदार आहेत. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत या ५८ मतदारसंघांपैकी ५३ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने प्रत्येकी दोन जागा मिळवल्या, तर एका जागेवर राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवाराचा विजय झाला होता.

जाट मतदारांचा प्राबल्य असलेल्या या भागांत मतदान होणार असून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना या भागांतील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे यंदा भाजपला या मतदारसंघात कसा प्रतिसाद मिळतोय याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.



