सी सी टीव्ही कॅमेरे असूनही वारजेत नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर ; कॅमेरे दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

पालिका प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षेशी घेणे देणे नाही ; दिपाली धुमाळ यांचा आरोप
वारजे : नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या वतीने वारजे परिसरात बसवण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे व संबधित यंत्रणा गेले काही महिने बंद असतानाही महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेने नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली असून प्रशासनाला नागरिकांशी काही देणे घेणे नाही असा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.
दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने निधी खर्च करून गीतांजली सोसायटी, राजयोग सोसायटी, समता कॉलनी, लभडे पार्क, स्वामी विवेकानंद सोसायटी, विघ्नहर सोसायटी, त्रिलोक सोसायटी सिद्धकला, सपकाळ कॉलनी हा सगळा परिसर सीसीटीव्ही फुटेज खाली आणण्यात आला आहे. मात्र मागील काही महिने ही यंत्रणा बंद असल्याने येथील सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे महापालिकेचे प्रशासक काय करत आहेत? विद्युत विभाग व स्थानिक वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांची उदासीनता का ? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दिपाली धुमाळ म्हणाल्या की, नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे कॅमेरे बसविण्यात आले, मात्र गेली काही महिने ते बंद असताना पालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे कॅमेरे सुरू केले जावेत याकरिता संबधित खात्याकडे वारंवार तक्रार केली आहे. पत्रव्यवहार ही केला आहे. मात्र पालिका प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षते बाबतीत गांभीर्य दिसत नाही. या भागात चोऱ्यांचे प्रकार घडतं आहेत. घरफोड्या होत आहेत मात्र कॅमेरे बसवून त्याचा फायदा पोलीस प्रशासनाला होत नाही. केवळ किरकोळ निधीसाठी हे कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे पालिकेवर असलेले प्रशासक नक्की कोठे कामे करत आहेत, कुठे निधी खर्च करत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे.
सी सी टीव्ही कॅमेरे बसवून ही नागरिकांची सुरक्षा धोक्यात येणार असेल आणि हे कॅमेरे सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर नागरिकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिपाली धुमाळ यांनी दिला आहे.







