मुळीकांचे आरोप बिनबुडाचे-आमदार टिंगरे

पुणे: भामा आसखेड योजनेचे काम भाजपला वेळेत मार्गी लावता आले नाही आणि आता स्वतःचे अपयश झाकण्यासाठी माजी आमदार जगदीश मुळीक बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी दिले आहे.
भामा आसखेड योजनेसाठी जवाहरलाल नेहरू योजनेतून ३८० कोटींचा निधी मंजूर झाला होता.. त्याच वेळी महापालिकेचा हिस्सा ठरला होता. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षांनी केवळ प्रक्रिया पूर्ण केली. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळातच भामा आसखेडचे काम सुरू झाले. भाजपच्या राजवटीत काम दोन वर्ष बंद पडले होते, असे आमदार टिंगरे यांनी पत्रकात म्हटले आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे योजनेचे काम मार्गी लागत आहे असा दावा टिंगरे यांनी केला आहे.

पुणे शहराच्या वडगांव शेरी, येरवडा भागाला पाणी पुरविण्यासाठी भामा आसखेड योजना राबविण्यात आली आहे. योजना पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यावर कामाच्या श्रेय घेण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक आणि आमदार सुनिल टिंगरे यांच्यात शाब्दिक वादावादी जुंपली आहे .









