महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संदर्भ ग्रंथ निर्मिती पुरस्कार प्रा. हरी नरके यांना जाहीर

पुणे/कोथरूड : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या विशेष ग्रंथकार पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रा. हरी नरके यांना संदर्भ ग्रंथ निर्मितीचा श्रीपाद जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे. ॲड. जयदेव गायकवाड यांना सत्यशोधक केशवराव विचारे पारितोषिक जाहीर झाले आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक व इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २६) ही पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली.
पारितोषिक वितरण सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर आदी उपस्थित राहणार आहेत. वामनराव देशपांडे, डॉ. चैतन्य कुंटे, डॉ. राजेंद्र दास, नीलम माणगावे, सविता घाटे, प्रवीण काळोखे व रश्मी काळोखे, विजय बाविस्कर, अरुणा सबाने, प्रभाकर साळेगावकर, स्वाती राजे, अरुण नूलकर, श्रीकांत बोजेवार, अरुण हरकारे, सुनील माळी, सम्राट फडणीस, डॉ. नलिनी गुजराथी आणि डॉ. विलास देशपांडे यांनाही विविध क्षेत्रांतील योगदानासाठी पारितोषिके जाहीर झाली आहेत. रोख रक्कम आणि सन्मानपत्र, असे या पारितोषिकांचे स्वरूप आहे.







