वारजे हायवे व सोसायटी भागात पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासनाचा गलथान कारभार जबाबदार : बाबा धुमाळ

वारजे : मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे आज वारजे परिसरातील उरीटनगर भागामध्ये पावसाचे पाणी पार्किंगमध्ये नागरिकांच्या घरांमध्ये तसेच व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये शिरले. महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी केला आहे.
आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत असताना महामार्गावरचे पाणी मोठ्या प्रमाणावर सेवा रस्त्यावर आल्याने सेवा रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले होते, तर या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. आज बाबा धुमाळ यांनी सर्वत्र फिरून परिस्थिची पाहणी केली. उरीटनगर मध्ये पावसाळी लाईनचे नियोजनाची वारंवार मागणी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाळी पाण्याच्या नियोजनाबाबत प्रशासनाची उदासीनता या सर्व परिस्थितीला कारणीभूत असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

महामार्गाच्या कडेने सेवा रस्त्याला लागून पावसाच्या पाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असली तरी त्याची योग्य देखभाल नसल्याने सेवा रस्त्यांवर पाणी साठत आहे. पावसाच्या पाण्याच्या नियोजनाची वारंवार मागणी केली असताना पालिका प्रशासना बरोबरच महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ही पावसाचे पाण्याचे नियोजन करण्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यानेच ही भयंकर परिस्थिती निर्माण होत असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.












