भुसारी कॉलनी, बावधन,शास्त्रीनगर भागाचा पाणीपुरवठा सुरळीत करा ; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा अल्पना वरपे यांचा इशारा..

कोथरूड : भुसारी कॉलनी, बावधन, शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना गेले २-३ महिन्यापासून कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या परिसरातील पाणी पाणी पुरवठ्या बाबत तातडीने योग्य ते नियोजन करावे अन्यथा नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी दिला आहे.
या संदर्भातील पत्र अल्पना वरपे यांच्याकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. वरपे यांनी सांगितले की,
प्रभागातील शास्त्रीनगर सारख्या परिसरामध्ये नोकरदार वर्ग व कष्टकरी महिला राहतात, त्यांना सकाळी लवकर कामासाठी घरा बाहेर पडावे लागते, पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बाबत आम्ही वारंवार प्रशासानाला तक्रार करून देखील त्यावर अद्याप ठोस नियोजन होताना दिसत नाही. या उलट दिवसेंदिवस या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या बिकट होत चालली आहे.
या बाबत सखोल माहिती घेतली असता या भागाला पुरवठा होत असलेल्या चांदणी चौक टाकीची रोज येणाऱ्या पाण्याची लेवल पूर्वी पेक्षा 1 ते 1.5 मीटरने कमी झाली आहे, त्याचा परिणाम प्रेशरवर व पाणीपुरवठ्यावर होत आहे. याच टाकीतून पाषाण भागाला जाणार्या पाण्याची वेळ व पंपिगची वेळ वाढविल्यामुळे सदर पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरेसे पाणी मिळणे हा सर्वांचाच हक्क आहे. त्यामुळे पाषाण भागाला पाणी दिले जाते याच्यावर आमचा आक्षेप नाही परंतु आमच्या हक्काचे पाणी बंद करून दुसरीकडे देणे हा आमच्या भागातील नागरिकांवर अन्याय केला जात असून तो सहन केला जाणार नाही
खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा असताना देखील केवळ चुकीचे नियोजन व अधिकार्यांच्या दिरंगाईपणामुळे लाखो नागरिकांना त्रास सहन कराव लागत आहे व केवळ योग्य नियोजन नसल्यानेच हि कृत्रिम पाणी टंचाई उद्भवली आहे, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना आपण पाणीपुरवठा विभागाला दयाव्यात, अन्यथा नागरिकां समवेत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात वरपे यांच्याकडून देण्यात आला आहे.




