सागर कॉलनी येथील रस्ता रुंदीकरणातील बाधितांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता महापालिकेने करावी ; अल्पना वरपे

कोथरुड : कोथरूड मधील सागर कॉलनी येथील डीपी रस्ता रुंदीकरणातील मिळकत बाधितांनी रस्त्यासाठी जागा ताब्यात देऊन महापालिकेला सहकार्य केले व अनेक वर्षांचा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला. आता या बाधितांना जागा ताब्यात घेण्यापूर्वी देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता महापालिका प्रशासनाने तातडीने करावी व त्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार व महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. Municipal Corporation should fulfill the promise given to those affected by the road widening at Sagar Colony; Alpana Warpe
या संदर्भातील निवेदन महापौर व महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा करून बाधितांचे प्रश्न सोडवण्यात येतील असे महापौरांनी सांगितल्याचे वरपे यांनी सांगितले.
वरपे यांनी म्हंटले आहे की, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला कोथरूड येथील सागर कॉलनी, डी पी रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात मार्गी लागला सदर रस्ता करताना याच ठिकाणी अनेक वर्षापासून राहत असलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन योग्य
रित्या करावे या अटीवर या रहिवाश्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी जागेचा ताबा दिला व मनपा प्रशासनाला सहकार्य केले. सदर बाधित होणाऱ्या नागरिकांशी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना सहकार्य करण्यास तयार करण्यात आले होते. या वेळी त्यांना प्रशासना तर्फे काही आश्वासने दिली होती त्यापैकी १. विजयश्री सोसायटी, महेश विद्यालय जवळ या अपार्टमेंट मध्ये सदनिका देण्यात येईल. तो पर्यंत ऋतुगंध सोसायटी व शिवतारा सोसायटी येथे तात्पुरती निवासाची सोय करण्यात येईल. २. बिगरनिवासी गाळे धारकांचे राष्ट्रीय फेरीवाले धोरण अंतर्गत पुनर्वसन करण्यात येईल. तरी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महापालिकेने करावी.

तसेच सदर बाधितांना या सदनिकांचे ताबे देत असतानाच त्यांना ताबे पावती वेळी निवासीसाठी १२००० रु व बिगरनिवासीसाठी ३५००० रु अशा रकमेचा भरणा करण्यात यावा अशी मागणी होत आहे. परंतु आधीच लॉकडाऊन मुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असताना व रस्ता रुंदीकरण करते वेळी त्यांनी केलेले सहकार्य लक्षात घेता त्यांना यातून सुट देण्यात यावी व विनामोबदला ताबे पावती करून देण्यात यावी अशी मागणी वरपे यांनी केली आहे.
महेश विदयालय येथील विजयश्री या सोसायटीतील सदनिकांच्या ताबा व तेथील रस्त्याचा प्रश्न सुटे पर्यंत सदर बाधितांना तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेल्या ऋतुगंध व शिवतारागार्डन या इमारतींमध्ये मुलभूत सुविधा उदा. वीज, पाणी, स्वच्छता, लिफ्ट या बाबींबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात. आधीच लॉकडाऊनमुळे या सर्व गोष्टींना बराच उशीर झाला आहे, त्यामुळे अधिक वेळ न घालवता सदर नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची विनंती वरपे यांनी केली आहे.



