मशिदींवरील भोंगे 3 मे पर्यंत उतरवा : राज ठाकरे

ठाणे : राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील उत्तर सभेत बोलताना सरकारला अल्टिमेटम देत ३ तारखेपर्यंत भोंगे उतरवा, हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे असे सांगत आमची भूमिका मागे घेणार नाही असे स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, मशिदीवरचे भोंगे काढा हे मी आधीच सांगितंल होतं. पण ऐकू नाही आलं. याचा देशाला त्रास होतोय. धार्मिक विषय कुठं आहे, प्रार्थना तुमची आहे आम्हाला कशाला ऐकवताय. तुम्हाला सांगून जर कळत नसेल की आम्हाला त्रास देऊ नका, तर तुमच्या मशिदी बाहेर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार. देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असे सांगत त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर, तुमच्या मशिदीबाहेर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, ३ तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाहीये. आम्हाला त्याची इच्छादेखील नाही. त्यामुळे १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी राज्य सरकारने चर्चा करावी आणि त्यांना सगळे भोंगे खाली उतरवण्यास सांगावे.

ठाण्यातील पोलिसांना माझ्या गाड्यांचा ताफा लहानसहान संघटनांकडून अडवला जाणार आहे, याची माहिती मिळते. पण याच गुप्तचर यंत्रणांना शरद पवार यांच्या घरावर लोक जाणार आहेत, हे कळाले नाही, अशी खोचक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. पण या गुप्तचर यंत्रणांना सगळी माहिती असते. एखादा माणूस शिंकला तर तो साधा शिंकलाय की करोनाचा शिंकलाय, हेदेखील कळतं, असे सांगत राज ठाकरे यांनी गुप्तचर यंत्रणांच्या एकूणच भूमिकेविषयी शंका उपस्थित केली.






