नेपाळमध्ये विमान अपघात; आतापर्यंत ३६ मृतदेह मिळाले

काठमांडू : नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झाले आहे. एअरलाईन्स एअरक्राफ्ट या कंपनीचे हे विमान होते. बचाव कार्य करत असताना आतापर्यंत ३६ मृतदेह मिळाले आहेत. यापैकी पाच भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना बचाव कार्यात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
या विमानात पाच भारतीय, चार रशियन, एक आयरलँड, कोरियाचे दोन, अर्जेंटिना आणि फ्रांसचा एक-एक नागरिक होता. नेपाळच्या विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांमध्ये सहा लहान मुलांचाही समावेश आहे. येती एअरलाईन्स एअरक्राफ्टचे (Yeti airlines aircraft) प्रवक्ते सुदर्शन बार्तोला यांनी सांगितले की, या विमानत ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. काठमांडू वरुन पोखरा येथे हे विमान आले होते. मात्र जुन्या विमातळावर दुर्दैवाने अपघात झाला. याठिकाणी बचावकार्य सुरु आहे.




